डॉ. आनंदा पांडूरंग कांबळे
राजर्षी शाहू महाराज यांची दूरदृष्टी भारताच्या पुरोगामी वैचारिक व्यवहारांमध्ये दूरगामी बदल घडवणारी व प्रभाव टाकणारी ठरली आहे. जनतेच्या गरजा भागवणे म्हणजे राज्यकारभार चालवणे किंवा करणे. इतक्या मर्यादित दृष्टीने राज्यकर्ते त्या काळात राज्यकारभाराकडे पाहत होते. पण यातून पुरेशा सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणा होत नव्हत्या. तर फक्त लोकांच्या गरजा किंवा प्रश्न निर्माण झाल्यासच, ते प्रश्न सोडवण्याचे काम त्यावेळी राज्यकर्ते करत होते. या इतर राज्यकर्त्यांच्या पेक्षा राजर्षी शाहू महाराजांची दृष्टी वेगळी होती. राजर्षी शाहू महाराजांनी जनतेच्या तत्कालीन गरजा तर पूर्ण केल्याच, पण पारंपरिक धर्म व्यवस्थेने ज्या-ज्या समता पूरक गोष्टी नाकारल्या होत्या, त्यामध्ये स्वतःहून बदल केला. हे त्यांच्या राज्यकारभाराचे क्रांती सूत्र होते. त्यांनी राज्यसंस्थेचा वापर करून समताधिष्टीत समाज रचना बनवण्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रात नवीन न्यायाच्या संकल्पनेची प्रस्थापना केली.
राजर्षी शाहू महाराजांचे कार्य पाहिले असता, ते काळाच्या पुढे असलेले दिसतात. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचा समाज स्त्री शोषणात जगत असताना, राजर्षी शाहू महाराज स्त्री शिक्षणावर भर देतात. स्त्रियांना शिक्षण देणे, विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणे, बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करणे, देवदाशी प्रथेवर बंदी घालणे अशा व्यापक अर्थानी स्त्रियांच्या सर्वांगीण शोषणमुक्तीचे कार्य राजर्षी शाहू महाराज करताना दिसतात. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा, लघुउद्योग, वस्त्र व विणकाम उद्योग, सहकारी संस्था यांचे निर्माण अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला राजर्षी शाहू महाराज हातभार लावतात. कलाक्षेत्राला राजाश्रय दिल्यानेच संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला यांचा विकास आणि विस्तार कोल्हापूर संस्थानाने केलेला पाहावयास मिळतो. या सर्व कार्यात धोरणात्मक बदल घडवून आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण शैक्षणिक कार्याने पारंपरिक विषमतावादी प्रथा, परंपरा, चालीरीती, रुढी व न्यायाची कल्पना यांना विरोध करून, नवीन सामाजिक न्यायाची शास्त्रशुद्ध व व्यवहारवादी संकल्पना राजर्षी शाहू महाराज निर्माण करताना पहावयास मिळतात.
Pages: 70-75 | 86 Views 27 Downloads